“मोदींनी देशाची माफी मागावी”; चिनी सैन्य माघारी परतताच काँग्रेसनं केली मागणी

पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. अखेर चर्चेअंती तणाव निवळवण्याच्या दिशेनं सोमवारी पावलं पडली. चीननं सैन्य माघारी घेण्यास सुरूवात केली आहे. चीनकडून सैन्य माघारी घेण्याचा निर्णय झाल्यानंतर काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
१५ जून रोजी मध्यरात्री गलवान व्हॅलीत लष्करी संघर्ष उफाळून आला. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर चीनचेही काही सैनिक मरण पावले होते. या संघर्षानंतर सीमेवरील तणावाबरोबरच दोन्ही देशातील संबंध ताणले गेले होते. त्यानंतर लष्करी आणि राजनैतिक चर्चेतून तणाव कमी करण्याच्या दिशेनं पावलं टाकली. चर्चेअंती चीननं पीपी१४ येथून सैन्य माघारी घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी केली.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खेरा म्हणाले,”आमच्या शूर लष्करानं चिनी सैन्याला परतवून लावण्याचा प्रयत्न केला आणि आपण आनंदानं पाहत आहोत की, लष्कर त्यात यशस्वी झाल्याचं रिपोर्ट सांगत आहेत. आपल्याला लष्कराचा अभिमान आहे. आपल्या सैन्याच्या क्षमतेबद्दल कधीही शंका नव्हती. यापूर्वी सैन्यानं हे काम केलं होतं, मग तो पाकिस्तान असो की चीन. आपल्या सैन्याला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही,” असं खेरा म्हणाले.
यावेळी खेरा यांनी गलवान व्हॅलीतील सीमाप्रश्नी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचा हवाला दिला. ते म्हणाले, “पंतप्रधानांनी केलेलं ते विधान दुर्दैवी होतं. दोन तासाच्या आत चीननं ते विधान भारताच्या पंतप्रधानांनी क्लिन चीट दिली म्हणून चालवलं. त्याचवेळी चीननं केलेल्या निवेदनात गलवान व्हॅलीवर ताबा सांगितला होता. हे दुर्दैवी आहे की पंतप्रधानांसारखी व्यक्ती अशा शब्दांचा उल्लेख करते, ज्याचा चीनने क्लिन चीट म्हणून वापर केला. हे संपूर्ण जग पाहत होतं,” असं खेरा म्हणाले.
“पंतप्रधानांनी आज ही चालू आलेली संधी घेतली पाहिजे. त्यांनी समोर येऊन राष्ट्राला संबोधित केलं पाहिजे. देशाला विश्वासात घ्यावं व देशाची माफी मागावी. त्यांनी असं म्हणायला हवं की, हो मी चुकलो. मी तुमची दिशाभूल केली. किंवा मला वेगळे शब्द वापरायचे होते, पण मी चुकीचे बोललो,” अशी माफी पंतप्रधानांनी मागावी, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

No comments

Powered by Blogger.